अजित पवार आणि मुख्यमंत्री पदं

दिनांक:-५/०७/२०२० रोजी प्रकाशित,

शरद पवारांची जशी पंतप्रधानपदाची सुप्त इच्छा जगापासून लपून राहिलेली नाही तशी अजित दादांच्या मनात मुख्यमंत्री पदाची लालसा असण्यास काहीही हरकत नाही, परंतू माझ्या मतानुसार शरद पवार जिवंत असे पर्येंत तरी ते दादांना मुख्यमंत्री होऊ देतील असं वाटतं नाही यामागे अनेक कारणे देखील आहेत

अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी कितीही लायक व्यक्ती असली तरी शरद पवारांसारखी कुटील डाव खेळणारी व्यक्ती जीवंत असे पर्येंत ते अजित पवार यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत, त्यांना जर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे असते तर २००४ सालीच केले असते नाहीतर पक्षातील सर्व आमदारांची इच्छा असून देखील २००९ साली त्यांनी दादांना मुख्यमंत्री केले नाही, ते आजही मुख्यमंत्रीपदी स्वतःची कन्या सुप्रिया सुळे यांना पाहतात त्यामुळे लायकी असताना देखील अजित पवारांचे मुख्यमंत्री पदी बसणे शक्य नाही,स्वतःचा पक्षावर वचक राहण्यासाठी कोणत्या व्यक्तीला किती महत्व द्यायचे,कोणाला किती वर आणायचे आणि कोणाला कसे नियंत्रणात ठेवायचे हे शरद पवार चांगलेच जाणतात.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रातील दादा नेत्यांमध्ये यांचा समावेश होता, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पद भूषवलेल्या या माणसाला सुरवातीला स्वपक्षात घेऊन त्यांचे महत्व कमी करून पुन्हा २००९ साली पंढरपुरात त्यांना पक्षाचे तिकीट देऊन पाडण्यात आले व त्यांचे राजकीय वजन संपवले. जे की जर विजयसिंह मोहिते पाटील काँग्रेस मध्येच राहिले असते तर कदाचित विलासरावांच्या आधी अथवा नंतर नक्कीच मुख्यमंत्री राहिले असते.(पुढे २०१९ साली माढा मतदारसंघातुन भाजपचा खासदार निवडून आणून विजयसिंह मोहिते पाटलांनी आपल्या पराभवाचा वचपा काढला देखील परंतु त्याला आता फार उशीर झाला होता).

अजून एक नेता म्हणजे छगन भुजबळ, एकेकाळी या माणसाला सेनेतून फोडून वर्षभर आपले नातेवाईक पद्मसिंह पाटलांकडे वर्षभर लपवून ठेवून बाळासाहेब ठाकरेंच्या दिसेल तिथे तुडवून काढा(खरं तर मारून टाका) अशा आदेशानंतर सुद्धा भुजबळांना शरद पवारांनी व्यवस्थित वाचवले व पुढे जाऊन पक्षातर्फे गृहमंत्रीपद/उपमुख्यमंत्रीपद अशा विविध प्रकारच्या संधी दिल्या मात्र जेंव्हा छगन भुजबळ राज्यांतील आपल्या ओबीसी वर्गातील समाजावर नियंत्रण आणू पाहत असल्याचे कळताच पुढे जाऊन भुजबळांच्या वाढत्या मागण्या पुरवणे आपल्याला अवघड जाईल हे लक्षात येताच त्यांनी भुजबळांचा महाराष्ट्र सदन घोटाळा बाहेर काढून पद्धतशीरपणे त्यांचे देखील राजकारणातील महत्व कमी केले.(सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीत अन्न व सुरक्षा मंत्री म्हणून कामं पाहत आहेत परंतु अमाप माया जमवल्या नंतर सुद्धा या खात्यात तेवढा दम नाही म्हणून अधून मधून कळ [छातीतील नव्हे😅] काढत असतात.

अजून एक नाव म्हणजे उस्मानाबादचे पद्मसिंह पाटील, एकेकाळी शरद पवारांचे खंदे समर्थक त्यांचे जवळचे नातेवाईक,यांनी सुद्धा महाराष्ट्रात विविध पद भूषवले आहेत यांचे देखील राजकीय बळ पवारांनी पद्धतशीरपणे कमी केले,१९९१ साली जेंव्हा शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले तेंव्हा महाराष्ट्रात बहुतांश आमदारांचा मुख्यमंत्री पदासाठी पद्मसिंह पाटलांना पाठिंबा होता परंतु आत्ता जर पद्मसिंह पाटलांना मुख्यमंत्री केले तर भविष्यात ह्या माणसाने ५-२५ आमदार घेऊन वेगळी चूल मांडली तर आपल्याला अडचण येऊ नये शरद पवारांनी पाटलांऐवजी सुधाकर नाईकांना मुख्यमंत्रीपदी बसवले.(सद्याघडीला राष्ट्रवादीत आपले काही भविष्य नाही हे ओळखून पद्मसिंह पाटील व त्यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये आलेले आहेत)

वरील सर्व उदाहरणे हे केवळ मोठ्या नेत्यांची आहेत अजूनही मला कितीतरी नेत्यांची नावे इथे सांगता येतील परंतु उत्तर फार लांबलचक आणि कंटाळवाणे होईल.

शेवटी मला कळलेले शरद पवार हेच आहेत की ते राजकारणात तुम्हाला विविध पदं देतील,मानसन्मान देतील परंतु जेंव्हा तुमचे महत्व कोठेतरी वाढायला लागले तुमचा काटासुद्धा पद्धतशीरपणे काढतील.

शरद पवारांचे राजकारण हे नेहमीच सुडाचे राजकारण राहिलेले आहे,सर्वसमावेशकता हा प्रकार त्यांच्याकडे आपणांस पहावयास मिळणार नाही, येनकेन प्रकारे स्वतःचे महत्व टिकवणे हा त्यांचा स्थायीभाव आहे त्यामुळेच राजकारणात एका विशिष्ठ उंची पलीकडे ते कधी जाऊ शकले नाहीत

-ऋषी भूमकर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय,औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

Was Gandhi really a Mahatma?

खराखुरा पँथर!

उद्धव ठाकरे एक आदर्शवादी मुख्यमंत्री?